सध्याच्या जीवनपद्धतीमुळे पौष्टिक अशा तृणधान्याचे क्षेत्र व वापर कमी होत असल्याने चालू वर्षी देश ते गावपातळीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. महाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) घोषित केले आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील गावागावांत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने महिनानिहाय विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.पौष्टिक तृणधान्यभारत हा जगातील पिकवणारा व नियमित वापर करणारा एक प्रमुख देश आहे.सध्याच्या जीवनपद्धतीमुळे पौष्टिक अशा तृणधान्याचे क्षेत्र व वापर कमी होत असल्याने चालू वर्षी देश ते गावपातळीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.त्यामधून पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्यविषयक महत्त्व पटवून दिले जाणार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही कृषी व कृषी संलग्न विभागांमार्फत केली जाणार आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरीय कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य प्रक्रियाबाबत प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांशी संवाद, विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे.या माध्यमातून कृषी विभाग सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे काय आहेत, या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहे. यानिमित्त प्रत्येक कृषी सहायक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थांची माहिती देण्यात येणार आहे. नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली, इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करून बनविता येतात. असे पदार्थ बनवून त्यांचा आहारात समावेश वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.